कुमार विश्वकोश मुखपृष्ठ स्पर्धा : काही निवडक क्षण



चालू
करण्यासाठी (क्लीक करावे)

कुमार विश्वकोश मुखपृष्ठ विजेते स्पर्धक

ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्येवर रोज काही नी काही चर्चा होत आहेत। त्यासंबंधाने लिखाण होत आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी संस्था पुढे सरसावत आहेत. या उपक्रमात आता खारीचा वाटा उचललाय तो महाराष्ठ्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा’ने. ‘जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयावर तीन खंडांचा ‘कुमार विश्वकोश’ प्रकाशित करण्यासाठी विश्वकोश निर्मिती मंडळ सज्ज झालं आहे. शालेय स्तरावरील मुलांना पर्यावरणाचे महत्व समजावं, यासाठी प्रकाशित केल्या जाणा-या या तिन्ही खंडात आकर्षक रंगीत चित्रांचा समावेश केला जाणार आहे।

प्रथम : यशश्री कांबळी फायनल इयर (जे.जे.आर्ट)

विश्व
कोश म्हटला की हजार-हजार पानांचा एखादा जाड, जाडसा ग्रंथच डोळ्यासमोर उभा राहतो। त्यातील नोंदी माहितीवर्धक असल्या तरी ती हजार पान वाचायची म्हणजे, कधीतरी चुकुन पुस्तक डोळ्यासमोर धरणा-यांच्या कपाळाला आठयाच पडणार. ‘कुमार विश्वकोश’ हा नियमित विश्वकोशाच्या सर्वसाधारण कल्पनेला छेद देणारा असणार आहे. हा विश्वकोश 12 ते 19 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी असल्याने पाहताक्षणीच मुलांना तो हाती घ्यावासा वाटेल, अस त्याचं रुप असणं आवश्यक होत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर विश्वकोशाच्या मुखपृष्ठासाठी स्पर्धा घोषित करण्यात आली होती। जे.जे. अप्लाईड आर्ट, रचना संसद यांसारख्या कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत जे.जे. अप्लाईड आर्ट फायनल इयरची विद्यार्थिनी यशश्री कांबळी हिने पहिला क्रमांक पटकावला. तर द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे तारिणी दीक्षित, नम्रता गोसावी यांनी मिळवला. जयसिंग महेंद्र, अजयकुमार कडले, मानसी पारिख या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली।

बुधवारी या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचं प्रदर्शन प्रभादेवी येथील रवींद्र नाटयमंदीरात आयोजित करण्यात आलं होतं। मुंबई विद्यापीठाचे जीव विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. संजय देशमुख, स्लीप स्पेशालिस्ट डॉ. अभिजीत आणि प्राजक्ता देशपांडे, कर्णबधिर मुलांच्या शाळेच्या विश्वस्त डॉ. लता पाटकर, रचनाच्या प्रचार्य डॉ. सविता खरात, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कुमार कदम, रवींद्रचे संचालक नाईकडे आदींनी या प्रर्दशनास उपस्थिती दर्शवली. याबाबत डॉ. वाड यांनी सांगितल की, हा विश्वकोश शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी असल्याने तो सोप्या भाषेत असावा, हा प्रमुख निकष होता. जीवसृष्टी चराचराला व्यापून टाकणारा विषय़ असल्याने त्यामध्ये सुंदर चित्रेही असली पाहिजेत, असा आमचा अट्टहास होता. हा खंड सुंदर करायचा तर त्यासाठी त्यांच मुखपृष्ठ ही तितकंच सुंदर असंण अभिप्रेत होत. एखाद्या नवोदित-तरुण कलाकाराच नककीच अधिक ताजं, आकर्षक असेल असं वाटल्यान, ही स्पर्धा घेतली होती. प्रथम क्रमांकाच चित्र मुखपृष्ठ तर द्वितीय क्रमांकाच चित्र मलपृष्ठासाठी असणार आहे।

यासाठी दत्तात्रय पाडेकर, चंद्रकला कदम, मोहन बने यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. इतर उत्कृष्ठ 24 चित्रांचा समावेश असलेली कालदर्शिका वा त्याची एखादी ‘चित्रमय जीवविज्ञान’ अशी माहितापुस्तिका तयार करावी, त्याचप्रमाणे या चित्रांवर आधारित चारोळ्याही कवींकडून करुन घ्याव्यात, असा डॉ. वाड यांचा मानस आहे. होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेच्या सहकार्याने तयार केल्या जाणा-या या विश्वकोशाच्या पहिल्या खंडात 250 नोंदी तर दुस-या खंडात प्रत्येकी 300 नोंदी असणार आहेत. 31 डिसेंबर 2009 रोजी पहिला खंड व मल्टिमीडिया सीडी प्रकाशित केला जाणार आहे।



उत्तेजनार्थ



चित्रांकित विश्वकोश एक नवा वाटचाल

चित्रांकित विश्वकोश

विश्वकोश
निर्मिती मंडळाने यंदा एक कल्पक उपकम राबविला। त्यामुळे केवळ शब्द महत्वाचे न राहता चित्र ही महत्वाची ठरली. एका स्पर्धेचे स्वरुपही त्याला मिळाल. जेणेकरुन विश्वकोश देखण्या स्वरुपात जगापुढे यावा यासाठी नवी संकल्पना राबविण्यात आली. त्याचे स्वागत झाले. विश्वकोशाच्या निर्मितीचे नवे सीमोल्लंघनच झाले।

जेव्हा तरुणाई चित्रांकन करते तेव्हा त्यात एक वेगळाच ताजेपणा, एक वेगळीट टवटवी असते. जीवसृष्टी आणि पर्यावरण’ या कुमार विश्वकोश ग्रंथाला तरुण कलाकारांकडून मुखपृष्ठ करुन घेण्याचे ठरविले आणि तशी घोषणा विश्वकोशच्या वेबसाईटवर केली. या घोषणेला जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईट आर्ट. फाईन आर्ट रचना कॉलेज ऑफ आर्ट अँण्ड आर्किटेक्चर, ठाणे स्कूल ऑफ आर्ट, यांनी मोठया प्रमाणावर प्रतिसाद दिला. महाराष्ट्रातून एकूण 160 चित्रे आली. त्यांचे प्रदर्शन कलादालन, पु. ल. देशपांदे अँकेडमी येथे भरविले. ही चित्रे लावून गँलरी सजविण्यासाठी विश्वकोश परिवार मदतीस 29 सप्टेंबर रोजी कार्यालयीन वेळेनंतर उशिरापर्यंत होता. प्रदर्शनात चित्रे सौदर्यदृष्टीने कशी लावावी यासाठी प्रा. शुभानंद जोग आमच्यात आत्मीयतेने जमिनीवर बैठक मारुन काम करीत होते. विश्वकोशाच्या सचिव मिनाक्षी पाटील धावपळ करीत होते तर ‘रवींद्र’चे संचालक नाईकडे आत्मीयतेने काय हवे ते विचारीत होते. एक कलाप्रदर्शन इतकी माणसे जोडणारे असेल तर विश्वकोश हा ‘स्नेहकोश’ कसा होतो त्याचेच प्रत्यंतर आले.या स्पर्धेतील चित्रे चराचराला व्यापणारी होती. रचना कॉलेजने तर प्रचार्या सविता सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली एक ‘कॉलेजीय’ स्पर्धाच घेऊन निवडक चित्रे पाठवली. प्रा. जॉन डग्लस, प्रा. घरत, प्रा. शुभानंद जोग, डीन हेमंत नागदिवे, डॉ. वाघमारे, डॉ. राजीव मिश्रा, डॉ. संजय देशमुख, प्रशांत मानकर.. किती किती हात आणि केवढी आत्मीयता ‘सारी मने जुळो यावी... अवघा थाट दिसो यावा... आनंदाच्या पणत्यांनी ... आसमंत उजऴावा अशी स्थिती!

प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. हेमचंद्र प्रधान, संचालक, होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था यांनी केले. तर परिक्षण प्रतिभावंत कलाकार दत्तात्रय पेडणेकर, चंद्रकला कदम, आणि मोहन बने यांनी केले. यशश्री मोहन कांबळी, तारिणी दिक्षित, नम्रता गोसावी यांना अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. तिघी ‘जेजे’ च्या विद्यार्थीनी! उत्तेजनार्थ पारितोषिके जयसिंग महेंद्र, कडाळे अजयकुमार कडले (जेजेचेच) आणि मानसी बिपिन पारीख, (रचना कॉलेज ऑफ अप्लाईड आर्ट) यानी पटकावली।

खरंच, हा तरुणाईने चित्रांकित केलेला कुमार विश्वकोश खंड 1 जेंव्हा विद्यार्थ्यांच्या हाती पडेल तेंव्हा विश्वकोश मंडळाला श्रमसाफल्याचा आनंद मिळेल यात शंका नाही. वाट पहा मित्रांनो 31 डिसें. 2009 ची!

विश्वकोशाची निर्मिती ही अगदी आकर्षक रुपाने करण्यासाठी एकेक प्रयोग सुरु आहेत. त्या वाटेवरले हे एक नवे पाऊल आहे जे वाचकांना, अभ्यासकांना, ग्रंथप्रेमींना नवी माहिती जरुर देईल, पण त्यासोबतच देखणेपणानं आकृष्टही करील. चित्रांकित विश्वकोश एक नवी वाट आकारात आहे.

विश्वकोशाचा अठरावा खंड

डॉ. विजया वाड

मराठी भाषा व साहित्य यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबध्द आहे. साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या दोन मंडळांद्वारे महाराष्ट्र शासन मराठी भाषेच्या विकासासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असते. दिनांक 19 नोव्हेंबर, 1960 रोजी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना झाली. या मंडळाने मराठी विश्वकोशाचे 10 खंड प्रकाशित केले. तदनंतर मंडळाचे विभाजन होऊन दिनांक 1 डिसेंबर 1980 रोजी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन करण्यात आले. शासनाच्या या मराठी विश्वकोश निर्मिती उपक्रमांतर्गत आतापर्यंत 17 खंड प्रकाशित झाले असून ‘अंक’ ते ‘शेक्सपिअर, विल्यम’ पर्यंतच्या नोंदी त्यात आल्या आहेत . 20,182 पृष्ठे त्यात सामाविष्ठ आहेत. या मंडळाच्या देखरेखीखालीच मराठी विश्वकोशाचा हा अठरावा खंड प्रकाशित होत आहे.विश्वकोशात तत्वज्ञान, धर्म, साहित्य सारख्या विषयांच्या संदर्भातील नोंदी लिहताना मतमतांतरे संभवतात. अशा नोदींमध्ये विद्वान व तज्ज्ञ व्यक्ती स्वत:च्या धोरणांनुसार मते मांडण्याची शक्यता असते. ही मते विश्वकोशाने स्वत:ची मते म्हणून मांडलेली नसतात. विश्वकोशाची रचना करताना फक्त नोंदशीर्षकांचे बाबतीत ‘तत्सम’ शब्द संस्कृत प्रमाणे ठेवले आहेत. हा खंड वाचकांच्या हाती देताना श्रमसाफल्याचे सामाधान मंडळाच्या मनात आहे. या खंडात ‘शेख अमर’ ते सह्याद्री पर्यंतच्या नोंदीचा सामावेश असून महाजालकावरील विश्वकोशच्या संकेतस्थळावर (www.vishwakosh.org.in) या खंडातील काही भाग दिसू शकेल.

सीडीचा
संच जनतेसाठी यापूर्वीच मंडळाने केवळ 700/- रुपयांत उपलब्ध करुन दिला आहे। हा अठरावा खंडसुध्दा 175/- रुपये या सवलत मूल्यात जनतेस उपलब्ध करीत आहोत. ज्याप्रमाणे सतराव्या खंडातील काही अंश ‘बोलका विश्वकोशाच्या स्वरुपात आपण अंध बांधवांसाठी उपलब्ध केला, त्याचप्रमाणे अठराव्या खंडाचाही काही अंश अंधांसाठी उपलब्ध करुन देण्याचा मंडळाचा मानस आहे. विश्वकोश लोकाभिमुख व्हावा म्हणून मंडळाने सतराव्या खंडापासून ‘विश्वकोश राज स्पर्धा’ ही अभिनव ज्ञानवाचक वाचन चळवळ महाराष्ट्रभर सुरु केली आणि त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील 20जिल्हयांत या स्पर्धेचे आयोजन केले. ‘विश्वकोश कोशात न राहता विश्वात यावा’ ही इच्छा या स्पर्धेद्वारे फलद्रुप झाली. सांगावयास विशेष आनंद वाटतो की, या स्पर्धांमध्ये वय वर्षे 14 ते 76 या वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला. अठराव्या खंडासाठीही अशी ज्ञानवाचक वाचन चळवळ आपण चालू ठेवणार आहोत. विश्वकोशाचा हा ग्रंथ संपन्न करण्यासाठी मंडळाचे मान्यवर सदस्य, तज्ज्ञ, अनेक विद्वान, विश्वकोशाचा सर्व संपादकीय वर्ग आणि कार्यालयीन कर्मचारी तसेच शासकीय मुद्रणालय, वाई, शासकिय फोटोझिंको मुद्रणालय, पुणे शासन मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय, मुंबई, अनेक प्रसार माध्यमे, संस्था यांची अतोनात मदत झाली आहे. त्यांचे मनापासून आभार. जगभरातील वाचक मराठी विश्वकोशाचे आवडीने वाचंन करतात, असे संकेतस्थळावरुन ज्ञात झाले आहे. या खंडाचेही मराठी जगतात असेच आपूलकीने स्वागत होईल, असा मला विश्वास वाटतो.

(लेखिका विश्वकोशाच्या प्रमुख संपादक आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा आहेत.)

कुमार विश्वकोश मुखपृष्ठ पहिल्या 24 स्पर्धकांची यादी

प्रथम पारितोषिक
यशश्री मोहन कांबळी
(सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाई़ड आर्ट)
द्वितीय पारितोषिक

तारिणी दिक्षित
(सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाई़ड आर्ट)
तृतीय पारितोषिक

नम्रता विजय गोसावी
(सर जे. जे. स्कूल ऑफ अप्लाई़ड आर्ट)

उत्तेजनार्थ

1 2 3
1. जयसिंह महेंद्र (जे. जे. फाईन आर्ट) २. अजयकुवमार कडले (जे. जे. फाईन आर्ट) ३. मानसी पारिख (रचना कॉलेज)

कुमार विश्वकोश 'मुखपृष्ठ' स्पर्धक यादी

1 2 3
1. प्रियांका किशोर बोबडे ( जे. जे. स्कूल ऑफ अप्लाईड आर्ट) 2. समान मोहिते. (रचना कॉलेज) 3. राधिका कुसुरकर ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट)

4 5 6
४. किरण घाणेकर ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट) ५. किरण घाणेकर ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट) ६. अस्मिता कडेकर (रचना कॉलेज)

7 8 9
7 . सागर कांबळी ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट) ८. सुनिल कापसे (रचना कॉलेज) ९. शांभवी सिंग (रचना कॉलेज)

10 11 12
१०. सृष्टी गुप्ता (रचना कॉलेज) ११. कोमल सोनावणे ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट) १२. गिरिश ठकुर्डे ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट)

13 14 15
१३. अर्चना वाफेकर ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट) १४. तन्वी कोचरेकर (रचना कॉलेज) १५. तोरल मिस्त्री (रचना कॉलेज)

16 17
१६. मंगेश कापसे ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट) १७. कोमल सोनावणे ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट)

18
18. कोमल सोनावणे ( जे. जे. स्कूल ऑफ आर्ट)

सीडी माध्यमातील मराठी विश्वकोशः एक नवे दालन















तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी 1960साली मराठी विश्वकोशाच्या 20 खंडांचे स्वप्न पाहिले. त्यावेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ते स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा भक्कम आधार असलेली एक यंत्रणा शास्त्रीबुवांच्या दिमतीला दिली. 1960 ते 2008 हा 48 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी. ह्या कालावधीत विश्वकोशाचे 1 ते 17 खंड (एकूण पृष्ठे 20,182) मुद्रित स्वरूपात प्रकाशित झाले. पहिला खंड 1973 साली तर सतरावा खंड 2007 साली प्रकाशित झाला. ह्या सर्व खंडांची उपयुक्तता, त्यांची जी विक्रमी विक्री महाराष्ट्रात झाली आणि जी लोकप्रियता विश्वकोशाला लाभली त्यावरून निर्विवादपणे सिद्ध झाली. पुढे, प्रती संपल्याने व मागणी सतत असल्याने 2005 साली विश्वकोश मंडळाने खंड 1, खंड 2, व खंड 3 यांचे पुनर्मुद्रण केले. ते तीन खंड आणि

2007 साली प्रकाशित झालेला सतरावा खंड अशा चार खंडांच्या प्रती आज वाचकांना मिळू शकतात. मात्र खंड 4, ते खंड 16 ह्या एकूण 13 खंडांच्या प्रती आज उपलब्ध नाहीत. त्यामुळे एखाद्या वाचकाने विश्वकोशाच्या 1 ते 17 खंडांच्या संपूर्ण संचाची मागणी केली तर 'क्षमस्व, प्रती शिल्लक नाहीत' असं उत्तर नाईलाजाने द्यावं लागतं. अशी संपूर्ण संचाची मागणी आजही वारंवार होत असते आणि तेच नाईलाजाचे उत्तर देण्यावाचून दुसरा पर्याय नसतो. शिल्लक नसलेल्या खंडांचे पुनर्मुद्रण हे त्यासाठी लागणारा वेळ व पैसा ह्या दोन्ही निकषांवर पाहता प्रचंड काम आहे. मागील अनुभवावरून सांगायचं तर अशा पुनर्मुद्रणासाठी आणखी काही वर्षे जातील. ही जी काही वर्षे मधल्या काळात जातील तोपर्यंत विश्वकोशाचा संपूर्ण संच वाचकांना कसा मिळेल याविषयी चिंतन करीत असताना सीडी माध्यमाचा पर्याय तपासून पहावा अशी सूचना समोर आली. खंड 1 ते खंड 17 ही एकूण 20,182 पाने आहेत. ती स्कॅन करावी व ईबुक स्वरूपात ती वाचकांना उपलब्ध करता येतील काय हे पहायला काय हरकत आहे, असा विचार करून चाचपणी सुरू केली. हा सीडी माध्यमाचा पर्याय शक्य कोटीतला असून वेळ व खर्च ह्या दोन्ही दृष्टींनी पाहता विश्वकोश मंडळाच्या आटोक्यातील आहे हे लवकरच लक्षात आले. एकीकडे विश्वकोश मंडळाच्या आटोक्यातील असणारा हा पर्याय वाचकांसाठीही अनेक दृष्टींनी अतिशय उपयुक्त आहे असे आढळले. वाचकांसाठीच्या उपयुक्ततेतला सर्वांत महत्वाचा घटक हा किंमतीचा आहे हे लक्षात आले. विश्वकोशाचा प्रत्येक खंड हा सरासरी सुमारे 1200 पानांचा आहे. ह्या 1200 पानांच्या एका मुद्रित खंडाची सरासरी किंमत रू. 250/- आहे. म्हणजेच एकूण 17 खंडांचा संच विकत घ्यायचा तर वाचकाला तो एकूण रू. 4250 /- ह्या रक्कमेला पडतो. सीडी माध्यमातून हे 17 संपूर्ण खंड दिले तर वाचकाला ते केवळ रू. 750 /- इतक्या कमी किंमतीत देता येतील हे अधिक खोलात गेल्यानंतर लक्षात आले. हा सारा सर्व्हे सुखद वाटावा असा होता. पण हे सारे शक्य करता येईल काय हा यक्ष प्रश्न समोर होता. सांगताना समाधान वाटते की वाचकांच्या मागणीला प्राधान्य देऊन सीडी माध्यमातील विश्वकोशाच्या निर्मितीला मंडळाने प्राधान्य दिले. त्यानंतर झपाट्याने पावले उचलली, आणि अतिशय कमी कालावधीत 17 खंडांच्या एकूण 20,182 पानांचे महत्वाकांक्षी स्कॅनिंग पूर्ण केले. त्यापुढील तांत्रिक कामेही अथकपणे पूर्ण झाली. ह्या सर्व कामात विश्वकोश मंडळाच्या सर्वच सहकार्‍यांचे, अभ्यागत संपादकांचे व कर्मचारीवृंदाचे फार मोलाचे सहकार्य लाभले. महाराष्ट्राचे सांस्कृतिकमंत्री मा. अशोकराव चव्हाण व सचिव मा. भूषण गगराणी यांनी शासनाच्या बाजूने जे सातत्याचे प्रोत्साहन ह्या निश्चयपूर्तीसाठी दिले त्याला खरच तोड नाही. त्यांचे सहकार्य नसते तर हा प्रकल्प कधीच प्रत्यक्षात येऊ शकला नसता. आज सीडी माध्यमातील विश्वकोशाचे स्वप्न साकार झाले आहे. विश्वकोशाचे 17 संपूर्ण खंड असलेला एकूण 6 सीडींचा संच तयार झाला आहे. 28 एप्रिल 2008 रोजी मा. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते मंत्रालयात त्याचे रितसर प्रकाशन होईल. 1 जून 2008 पासून वाचकांना तो मिळू लागेल. 1 मे 2008 ते 31 मे 2008 ह्या कालावधीत विश्वकोश सीडी संच नोंदणीची सवलत योजना वाचकांसाठी खुली असेल. नोंदणी करणार्‍या वाचकांना रू. 750 /- चा विश्वकोश सीडी संच सवलतीत म्हणजे केवळ रू. 500/- मध्ये नोंदवता येईल. सीडी संचाची वैशिष्ट्येसर्व 1 ते 17 खंडांच्या सहा सीडींचा संच हा एका आकर्षक बॉक्सच्या पॅकींगमध्ये उपलब्ध होईल. विश्वकोशाच्या 1 ते 17 मुद्रित खंडांचे एकत्रित वजन केले तर ते सुमारे 34 किलो भरते. संपूर्ण सीडीं संचाचे वजन जेमतेम 150 ग्रॅम इतकेच आहे. म्हणजेच कोणालाही ते कुठेही सहजपणे घेऊन जाणे अगदी सहज शक्य आहे. लॅपटॉप वापरणारांसाठी तर तो एक चालता बोलता संदर्भस्त्रोत असेल. सतत प्रवास करणारांना व सोबत लॅपटॉप असणारांसाठी तर ते अतिशय सोयीचे असेल. विश्वकोश सीडी संच वापरणे अतिशय सोपे आणि ज्याला इंग्रजीत युजर फ्रेंडली म्हणतात असे आहे. आपल्याला हव्या त्या खंडाची सीडी संगणकाच्या सीडी ड्राईव्हमध्ये फक्त टाकायची. काही क्षणातच एक स्वागत पृष्ठ आपल्या स्क्रीनवर आपोआप येईल. आपल्याला हव्या खंडाच्या लिंकवर फक्त एकदा क्लीक केली की त्या खंडातील नोंदींची अकारविल्हे यादी समोर दिसेल. हव्या त्या नोंदीवर क्लीक केली की त्या नोंदीचे पृष्ठ समोर येईल. हवा तो संदर्भ काही क्षणात समोर मिळेल अशा प्रकारे सीडीतील आतील इंटरफेसची रचना आहे. संदर्भ पाहून झाल्यानंतर पुन्हा नोंदींच्या यादीत जाण्यासाठी फक्त आणखी एक माऊस क्लीक करायची. इतकी सोपी व्यवस्था आत आहे. सीडी आवृत्तीत आलेली सर्व 17 खंडांतील 20,182 पृष्ठे ही स्कॅन्ड पद्धतीने उपलब्ध केलेली असल्याने मूळ खंडातील पृष्ठ व सीडीतील पृष्ठ यांत तफावत वा कोणतीही चूक असण्याची शक्यता नाही. ज्यांना मोठ्या टाईपात विश्वकोशाच्या नोंदी वाचायच्या आहेत त्यांना मोठा व्ह्यू करण्याची सोय पीडीएफ रिडर मध्ये असते. त्यामुळे मोठ्या टाईपात आता विश्वकोश वाचन करता येऊ शकेल. चार हजार रूपयांचे मुद्रित विश्वकोश खंड सीडीमध्ये फक्त रू. 500/- मध्ये उपलब्ध झाले ह्या वैशिष्ट्यानंतरचे दुसरे मोठे वैशिष्ट्य म्हणजे हा सीडी संच छोट्या टेबलच्या ड्रावरमध्येही तुम्ही ठेवू शकाल. आजकाल चौरस फुटांचे वाढते भाव व आखडते फर्निचर यात विश्वकोशाच्या 17 खंडांना लागणारी जागा कुठे शोधायची ही समस्या अनेकांना भेडसावत असते. सीडी संच टेबलाच्या खणात, ब्रीफकेसमध्ये किंवा अगदी पर्समध्येही मावल्याने जागेची टंचाई भेडसावणार नाही. सीडीला वाळवीची भिती नाही. मुद्रित खंडांना आगीची भिती असते वा काही वर्षांनंतर पाने पिवळी पडणे, कागद पापडासारखा होणे असे धोके असतात. सीडीचा संच ह्या धोक्यांपासून जवळजवळ मुक्त असणार आहे. सामान्यतः अभ्यासाव्यतिरिक्त अतिशय जाड पुस्तके वाचन वा संदर्भासाठी हातात घ्यायला आजची तरूण मंडळी तयार नसतात. पण आपल्या संगणकावर वा लॅपटॉपवर त्यातले कंटेंट पहायला तरूणाई तयार असते. अशा नव्या पिढीतले जे आजपर्यंत विश्वकोशापासून दूर होते ते यामुळे विश्वकोशाच्या जवळ येतील अशी आशा वाटते. तसे झाल्यास तर्कतीर्थांचे स्वप्न ख-या अर्थाने पूर्ण झाले असे म्हणता येईल.
डॉ. विजया वाड
(अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ)

शेतकामाची अवजारे व यंत्रे...

शेतकामाची अवजारे व यंत्रे : भारतीय शेती पध्दतीची परंपरा फार पुरातन आहे. प्राचीन काळापासूनच निरनिराळया शेती पध्दतींचा अवलंब केला जात आहे. हवामान, जमिनीचा प्रकार इ. गोष्टी लक्षात घेता भारतीय शेती नैसर्गिक रीत्या विविध भागात विभागली गेली आहे. या कारणामुळेच प्रत्येक विभागातील शेती अवजारांची बनावट आवश्यकतेनुसार निरनिराळी आहे. ढोबळपणे नांगर, मैद, कुळव, केणी, पाभर, कोळपीयांसारखी अवजारे व विळा,कोयता,खुरपे,कुदळ,टिकाव इत्यादींसारखी साधने मुख्यत्वेकरून शेतकामासाठी वापरण्यात येतात.
शेतकामासाठी वापरण्यात येणारी औते, अवजारे आणि साधने काही जड तर काही हलकी असतात. माणसांकडून आणि जनावरांकडून या अवजाराद्वारे शेतीची वेगवेगळी कामे करून घेतली जातात. ही अवजारे पुरातन काळापासून पारंपरिक पध्दतीने उपयोगात आणली जात आहेत. आजही त्यामध्ये विशेष असा बदल झालेला आढळत नाही. पूर्वीप्रमाणेच ती अवजारे बाभळ, खैर, सागवान इ. स्थानिक उपलब्ध लाकडापासून बनवली जातात. खेडयातील सुतार व लोहार यांसारखे कारागीर त्यांची जडणघडण व दुरुस्ती करतात. आजच्या आधुनिक शेतीच्या युगात या अवजारांमध्ये काही सुधारणा घडवून आणून ती शेतीला अधिकाधिक उपयुक्त कशी बनवता येतील याबाबत शास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न केले जात आहेत.
अडचण उत्पन्न होईपर्यंत वापरल्या जाणा-या अवजारांत सुधारणा करण्याची साधारणत: प्रवृत्ती होत नाही. भारतात सद्य परिस्थितीत गतिशीलपणे शेतमाल जास्त प्रमाणात उत्पन्न करण्याची निकड अपरिहार्य बनल्यामुळे इतर कारागिरांप्रमाणे शेतक-यालाही आपली कार्यक्षमता वाढविण्याकरिता सतत सुधारलेल्या अवजारांचा उपयोग करणे आवश्यक झाले आहे. त्याचबरोबर शेतकामासाठी वापरल्या जाणा-या जनावरांच्या सुधारणेकडे लक्ष देणेही अत्यावश्यक बनले आहे.
भारतातील मशागतीची बहुतेक सर्व अवजारे जनावराकडूनच ओढली जातात. यासाठी प्रामुख्याने बैलांचा वापर केला जातो. या जनावरांच्या प्रजननाच्या बाबीकडे आणि पोषणाकडे काही अपरिहार्य कारणामुळे दुर्लक्ष होत असल्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेत -हास झालेला आहे. यासाठी जनावरामध्येही शास्त्रोक्त पध्दतीने सुधारणा घडवून आणणे हीसुध्दा आवश्यक बाब आहे.
निरनिराळया जातींच्या आणि वजनाच्या जनावरापासून अवजारे ओढण्यास उपलब्ध होऊ शकणा-या ताकदीचे मापन केले असता असे आढळून आले की ऋतुमान, जमिनीचा प्रकार इ. घटकांवर ताकद अवलंबून असते. या बाबींवर पाश्चात्त्य देशांत घोडयावर प्रयोग केल्यानंतर असे लक्षात आले की घोडा आपल्या वजनाच्या एकदशांश इतकी ताकद ओढण्याच्या कामी देऊ शकतो. स्थूलमानाने बैलसुध्दा याच प्रमाणात ताकद देऊ शकतात.
भारतात शेती अवजारे ओढण्यासाठी मुख्यत: वापरल्या जाणा-या बैलांच्याजाती, त्यांची सरासरी वजने यांची माहिती तसेच निरनिराळी अवजारे ओढण्यास लागणारी सरासरी ओढयाबद्दलची माहिती खाली दिलेली आहे.

शेती अवजारे ओढण्यासाठी वापरल्या जाणा-या बैलांच्या जाती
अवजारांना लागणारी सरासरी ओढ - (1) हलका नांगर : 67-68 किग्रॅ.; (2) मध्यम नांगर : 90-99 किग्रॅ.; (3) भारी नांगर : 150 पेक्षा जास्त किग्रॅ.; (4) कुळव : 54-90 किग्रॅ.; (5) पाभर : 54-81 किग्रॅ.; (6) कोळपे : 45-50 किग्रॅ.
नांगर, कुळव, पाभर, कोळपे, मळणीची साधने इ. देशी अवजारांत विशिष्ट प्रदेशातील पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, पिकाचा प्रकार, पीक पध्दती, उपलब्ध जनावरांची परिस्थिती इत्यादींप्रमाणे पुष्कळशी तफावत आढळते. विभागवार अवजारांची नावेसुध्दा वेगवेगळी आढळतात. या बाबी लक्षात घेऊन अवजारासंबंधी सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. यामध्ये अवजारांची वर्गवारी मशागतीच्या प्रकारानुसार करणे सोईचे असल्याने तशी वर्गवारी करणे योग्य ठरते.
पेरणीपूर्व मशागतीची अवजारे : पेरणीपूर्व मशागतीमध्ये शेतीची नांगरणी करणे ते फार महत्त्वाचे काम आहे. याकरिता पूर्वापारपासून देशी किंवा लाकडी नांगरांचा वापर केला जातो. विभागानुसार वेगवेगळे नांगर

आ. 1. देशी नांगर (लाकडी) : (1) रुमणे, (2) दांडी, (3) मुख्य भाग, (4) बूट, (5) फाळ.

वापरले जात असल्याने तशीच त्यांना नावेही आहेत. जमिनीच्या प्रकारा-नुसार नांगरांच्या आकारात आणि वजनात खूपच तफावत आढळून येते. त्यातील काही महत्त्वाचे नांगर म्हणजे सोलापूर नांगर, पुणेरी नांगर, भातशेतीमधील नांगर, चरोचर नांगर, पंचमहाल नांगर, धारवाडी हलका नांगर हे होत. हे सर्व नांगर सर्वसाधारणपणे ‘ देशी नांगर ’ या सदराखाली येतात. या देशी नांगरांचा फार पूर्वीपासून बैलांच्या साहाय्याने वापर करण्याची पध्दत आहे; परंतु या नांगरांच्या वापराने होणारी कामाची प्रत खूपच हलक्या दर्जाची असते आणि लागणारा वेळही खूपच जास्त असतो. शेतीतील बदलती आव्हाने लक्षात घेऊन आणि काळाची गरज विचारात घेऊन नांगरामध्ये खूप सुधारणा घडून आल्या आणि चांगल्या प्रतीची मशागत करणारे अनेक सुधारित नांगर आता अस्तित्वात आले आहेत. सुधारलेले नांगर हे मुख्यत्वे लोखंडी नांगर आहेत. सुधारित लोखंडी नांगरांचे बैलांच्या साहाय्याने चालवले जाणारे आणि कर्षित्राने (ट्रॅक्टरने) चालवले जाणारे असे प्रमुख दोन प्रकार आहेत. यांशिवाय त्यांच्या घडणीनुसार फाळांचे नांगर आणि तव्यांचे नांगर असेही दोन मुख्य प्रकार आहेत. अलीकडच्या काळात कर्षित्राच्या साहाय्याने चालणारा फिरता नांगरसुध्दा मुख्यत्वे उसाच्या शेतीमध्ये मोठया प्रमाणात वापरला जातो. बागायत क्षेत्रांत नेहमीच्या मशागतीच्या खोलीच्या खाली तयार होणारा कठीण स्तर किंवा तळजमीन फोडण्यासाठी आणि पाण्याचा निचरा वाढवण्यासाठी तळजमीन फोडण्याचे नांगर वापरण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. तळजमीन फोडण्याचे नांगर साधारणपणे 50 ते 60 सेंमी. खोलीवरचा कठीण स्तर फोडण्यासाठी उपयुक्त ठरले आहेत. प्रमुख सुधारित लोखंडी नांगरांचे थोडक्यात विवेचन खाली दिलेले आहे.
लोखंडी फाळाचा नांगर : लोखंडी फाळाच्या नांगरामध्ये एकतर्फी आणि दुतर्फी असे दोन प्रकार आहेत. बैलांच्या साहाय्याने चालणा-या फाळाच्या नांगराला एकच फाळ असतो. एका दिवसाकाठी 4 ते 6 बैलांच्या साहाय्याने 25 ते 30 गुंठे जमीन सरासरी 6 ते 7 इंच खोलीपर्यंत नांगरली जाते. कर्षित्राचा ( ट्रॅक्टरचा ) वापर करून 1 ते 5 फाळांचे एकतर्फी आणि दुतर्फी नांगर शेतांची नांगरणी करण्यासाठी आता वापरले जातात. या नांगरांच्या वापरामुळे नांगरणीच्या कामाचा वेग खूपच वाढलेला आहे. कर्षित्राच्या अश्वशक्तीनुसार कर्षित्राला कमी किंवा जास्त फाळाचा नांगर जोडला जातो. तास संपल्यानंतर नांगर कर्षित्रासह वळवताना किंवा एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेताना नांगर जमिनीच्या वर उचलून धरण्याची सोय कर्षित्रामध्ये केलेली असते. काही कर्षित्रचलित नांगराला मागील चाके नसतात. परंतु जमिनीच्या बाजूने चालणारे एक चाक असते. नांगराची जमिनीच्या बाजूकडील ओढ थांबविण्यासाठी आणि दाब कमी करण्या-साठी या चाकाचा उपयोग होतो. कर्षित्रचलित नांगराच्या वापराने जमीन 8 ते 10 इंच खोलीपर्यंत नांगरली जाते.
सरीचा नांगर : पेरणीपूर्व मशागत केल्यानंतर ऊस, बटाटा किंवा तत्सम पिकाची लागवड करण्यासाठी जमिनीत स-या तयार करण्यासाठी सरीच्या नांगराचा वापर केला जातो. या नांगराला असलेले दोन पंखे आत-बाहेर सरकवून सरीची रुंदी कमी-जास्त करता येते. बैलांचा वापर करून एका वेळेस एकच सरी तयार करता येते. कर्षित्राच्या साहाय्याने चालवल्या जाणा-या सरीच्या नांगराने एकाच वेळी अश्वशक्तीनुसार 3 ते 5 स-या तयार केल्या जातात. सरीची खोली कमी-जास्त करण्यासाठी कर्षित्रामध्येच सोय केलेली असते.
तव्यांचा नांगर : जमिनीच्या बाजूकडील ओढ व घर्षण कमी करण्यासाठी तव्यांच्या नांगराचा शोध व विकास करण्यात आला. हा नांगर ओढण्यासाठी फाळाच्या नांगरापेक्षा कमी शक्ती लागते. शिवाय कठीण व दगडगोटयांच्या जमिनी नांगरण्यासाठी तव्यांच्या नांगराचा उपयोग फायदेशीर ठरतो. नांगराच्या तव्याचा व्यास 60 ते 90 सेंमी. असून कडा धारदार असतात. नांगरणीची खोली कमी-जास्त करण्या-साठी तव्यांचा कोन कमी-जास्त करण्याची सोय यांत असते. नांगरावर वजन ठेवूनही खोली काही प्रमाणात वाढवता येते. कर्षित्राच्या अश्वशक्तीनुसार तव्यांची संख्या बदलते.
तळजमीन फोडण्याचा नांगर : सर्वसामान्यपणे जमिनीची मशागत एका ठराविक खोलीपर्यंतच होते. शिवाय वनस्पतींची मुळे सुध्दा ठराविक खोलीपर्यंतच जातात. ही खोली साधारणपणे 40 ते 60 सेंमी. एवढी असते. या खोलीच्या खाली जमिनीत कठीण तळजमीन तयार होते. या कठीण तळामुळे जमिनीतील जास्त झालेल्या पाण्याचा निचरा होत नाही आणि परिणामी जमीन पाणथळ बनू लागते. जमिनीची उत्पादनक्षमता त्यामुळे कमी होते. ती तळजमीन बागायत क्षेत्रामध्ये काही वर्षांतच गंभीर समस्या बनल्याने ती फोडून पाण्याला निच-यासाठी वाट करून देण्याचे काम हा नांगर करतो. या नांगराने 60 सेंमी. खोलीवरची तळजमीन फोडता येते. यापेक्षा जास्त खोलीवर तळजमीन फोडण्यासाठी जास्ती अश्वशक्तीच्या कर्षित्राचा वापर करावा लागतो. जमीन नांगरणे हा या नांगराचा उद्देश नसून कठीण तळजमीन फोडणे हा प्रमुख उद्देश आहे.
फिरता नांगर : हा नांगर अलीकडच्या काळात प्रचलित झाला आहे. यामध्ये दर मिनिटाला 300 फेरे घेणा-या आसावर धारदार पाती बसव-लेली असतात. पात्यांचा आकार कुदळीसारखा किंवा इंग्रजी ‘ एल ’ अक्षरासारखा असतो. औत सुरू झाले म्हणजे आसावर बसवलेली पाती आसाच्या वेगाने फिरतात. पाती असलेला आस फिरवण्यासाठी कर्षित्राच्या पी. टी. ओ. मार्फत शक्ती पुरवली जाते. वेगाने फिरणा-या पात्यामुळे जमीन एकसारख्या खोलीपर्यंत उखणली जाते. औत चालू असताना दगड अगर झाडांची मुळे किंवा इतर अवशेष आड आले तरी पाती तुटू नयेत म्हणून या यंत्रामध्ये विशिष्ट योजना केलेली असते. एका घडयाळी तासामध्ये सरासरीहेक्टर क्षेत्र नांगरून होते. या नांगराच्या वापराने मातीच्या ढेकळांचा चुरा होत असल्याने जमीन चांगली तयार होते. भारतात ऊस शेतीमध्ये या नांगरांचा वापर मोठया प्रमाणात होऊ लागला आहे. 35 ते 40 अश्वशक्तीचे कर्षित्र या यंत्राच्या वापराला पुरेसे ठरते.
कुळव : शेतजमीन नांगरल्यानंतर निघालेली ढेकळे फोडून तणकटे मोकळी करणे, जेणेकरून ती वेचून जमीन स्वच्छ करता येईल आणि माती भुसभूशीत करण्यासाठी कुळवाचा वापर केला जातो. पेरणीपूर्वी कुळवाची पाळी दिल्याने मातीत खत योग्य प्रकारे मिसळले जाते.
कुळवांचे मुख्य तीन प्रकार आहेत : (1) फासेचा कुळव, (2) तव्यांचा कुळव आणि (3) ड्रॅग प्रकारचा कुळव.
फासेचा कुळव : यामध्ये बाभळीच्या किंवा शिसवी लाकडाच्या 13X10 सेंमी. ते 18 X 13 सेंमी. जाडीच्या आणि 50 ते 100 सेंमी. लांबीच्या दिंडावर दोन्ही टोकांवर दोन जानोळी बसवतात. विदर्भात जानोळयालाच ‘ जानकुड ’ या नावाने संबोधले जाते. जानोळयाच्या खालच्या टोकाला लोखंडी कडी ( वसू ) बसवलेली असतात. यांत एका बाजूला

आ. 2. अखंड फासेचा कुळव : (1) रुमणे, (2) दिंड, (3) दांडी, (4) जानोळे, (5) फास.

धार केलेली लोखंडी फास बसते. दिंडावर बसवलेल्या रुमण्याच्या साहाय्याने कुळवाची खोली नियंत्रित केली जाते. खोली वाढवण्यासाठी दिंडावर वजन ठेवतात अथवा कुळव हाकणारा दिंडावर उभा राहूनसुध्दा ते साध्य करतो. कुळव सरासरी 5 ते 10 सेंमी. खोली-पर्यंत जमीन कुळवण्याचे काम करतो. कुळवाला जुंपलेले बैल मागेपुढे करूनसुध्दा खोली कमी-जास्त करता येते. एका दिवसाकाठी साधारणपणे एक हेक्टर जमिनीची कुळवणी करता येते. काही कुळवांच्या दिंडाला गोलसर बाक दिलेला असतो. काही ठिकाणी लोखंडी फासेला सरळ धार करण्याऐवजी दाते करण्याची सुध्दा पध्दत आहे.
भागांनुसार देशी कुळवांना वेगवेगळी नावे आहेत. ती अशी : (1) वखर, (2) पुणेरी कुळव, (3) कोंग्या कुळव, (4) भडोच कुळव, (5) अहमदनगर कुळव, (6) भाल कुळव, (7) बेळगाव कुळव, (8) मैंद, (9) डोणी, (10) फळी, (11) दुहेरी फळी, (12) मोगरी (हात कुळव ).
आधुनिक शेतीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बरेच सुधारित लोखंडी कुळव वापरात आहेत. सुधारित कुळवांचा वापर केल्याने मिळणारी कामाची प्रतही चांगल्या प्रकारची असते; परंतु अशा प्रकारचे सुधारित कुळव तयार करण्यासाठी लागणा-या सुविधांचा अभाव, त्यांची किंमत, देखभाल करण्यात येणा-या अडचणी इ. कारणांमुळे या कुळवांचा वापर मर्यादित प्रमाणातच राहिला आहे. तव्याच्या कुळवाचा वापर त्यातल्या त्यात मोठया प्रमाणात होतो.
तव्यांचा कुळव : तव्याचा कुळव कर्षित्रचलित किंवा बैलचलित प्रकारचा असतो. बैलचलित तव्यांच्या कुळवाला तव्यांच्या एक किंवा दोन ओळी ( गँग ) असतात. एका ओळीत सरासरी चार तवे आसावर बसवलेले असतात. दोन तव्यांत 15 सेंमी. अंतर असते. तव्यांचा व्यास बैलचलित कुळवात 30 - 35 सेंमी. असतो. कर्षित्रचलित तव्यांच्या कुळवासाठी 40 ते 60 सेंमी. व्यासाच्या तव्यांचा वापर करतात. आसावर ते 15 ते 25 सेंमी. अंतरावर बसवलेले असतात. या प्रकारच्या कुळवाला तव्यांच्या दोन किंवा चार ओळी ( गँग ) असतात. दोन गँगच्या कुळवात प्रत्येक आसावर सहा ते आठ तवे बसवतात. चार गँगच्या कुळवामध्ये प्रत्येक आसावरील तव्यांची संख्या कमी असते. गँगच्या रचनेनुसार तव्याच्या कुळवाचे सिंगल ऍक्टिंग, टँडम टाइप आणि ऑफसेट टाइप असे तीन प्रकार प्रचलित आहेत. तवे काम चालू असताना आसावर गोल फिरतात.
ड्रॅग प्रकारचा कुळव : या प्रकारात मोडणारे कुळव म्हणजे (1) सु-यांचा कुळव, (2) नॉर्वेजियन कुळव, (3) खुंटी कुळव, (4) स्प्रिंग कुळव, (5) ऍक्मे कुळव हे होत. त्याच्या काम करण्याच्या पध्दतीवरून त्यांना ओढण्याच्या प्रकारचे कुळव असे म्हणता येईल. या कुळवांचा वापर ढेकळे फोडण्यासाठी, माती भुसभूशीत करण्यासाठी, लहान तणांचा नाश करण्यासाठी आणि काही प्रमाणात जमिनीचा पृष्ठभाग सपाट करण्यासाठी होतो.
कल्टिव्हेटर : पेरणीपूर्व मशागतीसाठी शेताची नांगरणी केल्यानंतर कुळवाप्रमाणेच कल्टिव्हेटरचा वापर करणे पेरणीसाठी जमीन तयार करण्याच्या कामी उपयुक्त ठरते. कल्टिव्हेटर बैलचलित तसेच कर्षित्रचलित

आ. 3. बैलचलित स्वीप प्रकारचा कल्टिव्हेटर

प्रकारचे वापरात आहेत. कल्टिव्हेटरच्या वापरामुळे जमिनीतील ढेकळे फोडणे, तणांचे निर्मूलन करणे आणि जमीन भुसभूशीत करून पेरणी योग्य केली जाते. बैलचलित कल्टिव्हेटरचा वापर पिकांच्या आंतरमशागती-साठी सुध्दा करता येतो. तण निर्मूलनाबरोबरच पिकाला भर लावण्याचे कामही यामुळे होते. बैलचलित कल्टिव्हेटरमध्ये 5 ते 7 फणांचा वापर केला जातो.

जमीन सपाट करण्याची अवजारे : पेरणीपूर्वी काही प्रमाणात जमिनीचे सपाटीकरण ही आवश्यक बाब असते. उंचवटयाच्या भागाकडील माती अवजाराच्या साहाय्याने अथवा मजुराकडून सखल भागात पसरल्याने जमीन सपाट होते. पिकाला पाणी देण्याचे काम सपाट जमिनीत चांगल्या प्रकारे करता येते. या कामासाठी वेगवेगळी देशी अवजारे वापरात येतात.
लाकडी कुळव : लाकडी कुळवाच्या जानोळयांना दोरी गुंडाळून माती ओढण्याच्या कामासाठी वापरतात. हलक्या प्रमाणात सपाटीकरण करण्यासाठी याचा उत्तम उपयोग होतो. जानोळयांना गुंडाळलेल्या दोरीच्या आत एक फळी बांधल्यास सपाटीकरणाचे काम अधिक कार्यक्षमपणे होते.
गुटे फळी : साधारणपणे 100 ते 120 सेंमी. लांबीची आणि 25 ते 30 सेंमी. रुंदीची फळी घेऊन तिला एक रुमणे बसवलेले असते. गुटे फळीला दोन लोखंडी गोल कडया बसवून त्यांच्या साहाय्याने बैल जोडून माती ओढण्याचे काम करतात. फळीची खालची बाजू थोडीशी धारदार केलेली असल्याने फळीत माती गोळा होणे सोपे जाते. गुटे फळीत भरलेली माती बैलाच्या साहाय्याने इच्छित ठिकाणी पसरून जमिनीचे सपाटीकरण करतात.
केणी पेटारी : लहान वरंबे घालण्यास किंवा शेतातील खोलगट भाग भरून जमीन सपाट करण्यास केणी किंवा लोखंडी पेटा-याचा चांगला उपयोग होतो. साधारणपणे 90 X 37.5 सेंमी. आकाराच्या पोलादी पत्र्याच्या दोन्ही बाजू बाहेरच्या अंगाला 7.50 सेंमी. वाकवून त्याला सुपासारखा आकार देतात. त्याच्या मागील बाजूस मध्यभागी 90 ते

आ. 4. केणी

120 सेंमी. लांबीची दोन्ही बाजूंना दोन लाकडी दांडे बसवलेले असतात. पुढच्या बाजूला लोखंडी पट्टयांची एक फ्रेम बसवलेली असते. फ्रेमचा उपयोग बैल जुंपण्यासाठी होतो. लाकडी दांडक्यांचा उपयोग पेटारी तोलून धरण्यासाठी होतो. बैल चालू लागले की पेटारीत माती भरली जाते आणि ती खोलगट भागात सोडून जमिनीचे सपाटीकरण करतात. मोठमोठे बांध किंवा ताली घालण्याचे काम सुध्दा पेटारीच्या साहाय्याने चांगले होते. लोखंडी पेटारी तीन ते पाच घनफूट आकाराच्या असतात. बैलांची ताकद लक्षात घेऊन पेटारीचे माप ठरवण्यात आलेले असल्याने त्यानुसार लहान किंवा मोठी पेटारी वापरावी.
स्वयंचलित बलिवर्दधरा यंत्र : मोठमोठे उंचवटे सपाट करणे, मुरमाच्या कठीण जमिनीचे सपाटीकरण करणे, पाझर तलाव किंवा धरणाचे मोठमोठे बांध घालणे इ. कामासाठी स्वयंचलित बलिवर्दधरा यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राच्या साहाय्याने मातीची/मुरमाची मोठया प्रमाणात हालवाहालव करणे शक्य होते. यामुळे वेळेची आणि कष्टांची फार मोठया प्रमाणात बचत होऊन थोडया वेळात काम पूर्ण करणे शक्य होते.
मजुरांच्या साहाय्याने जमिनीचे सपाटीकरण करणे किंवा लहान बांध व ताली घालण्याच्या कामासाठी ज्या अवजारांचा उपयोग केला जातो त्यांत टिकाव, खोरे किंवा फावडे, घमेले, लाकडी किंवा लोखंडी दाताळ यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. टिकाव अथवा कुदळीच्या साहाय्याने माती खणून काढतात आणि घमेल्यांत भरून ती खोलगट भागात पसरून जमिनीचे सपाटीकरण करतात किंवा मातीचा बांध तयार करतात. लाकडी दाताळयाचा वापर करून तात्पुरत्या स्वरूपाचे सपाटीकरण करतात.
बंड फॉर्मर : वेगवेगळया अवजारांचा वापर करून भुसभूशीत झालेल्या जमिनीत लहान लहान आकाराचे बांध तयार करण्यासाठी बंड फॉर्मर हे बैलचलित अवजार वापरले जाते. सपाट जमिनीच्या मोठया भूभागावर

आ. 5. बंड फॉर्मर : (1) रुमणे, (2) मातीचा वरंबा तयार करणारे पाते, (3) दांडी.

पडणारे पाणी बांधांत अडवून ते जमिनीत मुरवणे यामुळे शक्य होते आणि त्याचबरोबर मृद्संधारणाचा उद्देशही साध्य होतो.

पेरणीची अवजारे व यंत्रे: जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हंगामानुसार पेरणीसाठी निरनिराळया अवजारांचा उपयोग केला जातो. पूर्वीपासून कुळव, देशीनांगरअथवा अरगडा यांच्या जानोळयालामागे पोकळ बांबूचे‘ सरते’ बांधून त्यातून बी पेरले जाते. पोकळ बांबूचे एक टोक फोडून चाडयाच्या आकाराचे करतात जेणेकरून बी पेरणा-याच्या हाताची मूठत्यावरव्यवस्थित बसेल.सरत्याची उंची साधारण पेरणा-याच्या खांद्यापेक्षा कमी ठेवली जाते. एकावेळी पिकाची एकच ओळ पेरावयाची असेल तेव्हा ‘मोघण’ हे अवजार वापरतात. यासाठी मनुष्य बळाचा वापरही केला जातो. महाराष्ट्रात पाभरीच्या पाठीमागे ‘ मोघण ’ जोडून दुस-या पिकाची एक ओळ पेरण्याचा प्रघात आहे. सर्वसाधारणपणे पेरणी करण्यासाठी लाकडी किंवा लोखंडी पाभरीचा वापर केला जातो. पेरणीच्या

आ. 6. तिफण : (1) चाडे, (2) नळया, (3) दोरी, (4) दांडी, (5) दिंड,
(6) फण, (7) रुमणे.

दोन ओळींतील अंतराच्या गरजेनुसार तीन फणी पाभर ( तिफण ) अथवा चार फणी पाभर ( चौफण ) वापरण्याचा प्रघात आहे.
काही भागात जमिनीच्या प्रकारानुसार पाच ओळी पेरण्यासाठी ‘ पाचफणी ’ किंवा ‘ कुर्गी ’ आणि सहा किंवा बारा ओळी पेरण्यासाठी ‘ गोरू ’ ही अवजारे वापरतात. याचा वार बेळगाव व तमिळनाडू भागात भाताचे बी पेरण्यासाठी करतात. बारा फणीचा वापर मुख्यत्वे नाचणी पेरण्यासाठी तमिळनाडू भागात करतात. ही अवजारे चालविण्यासाठी सामान्यत: दोन किंवा चार बैल आणि 2 ते 3 माणसांची आवश्यकता असते. साधारणत: दोन फणी ( दुसे ), तिफण किंवा चौफण किंवा पाच- फणी अवजाराच्या साहाय्याने दिवसाकाठी 1 ते 2 हेक्टर क्षेत्रावर पेरणी करता येते. सहा फणी किंवा बारा फणी अवजाराच्या साहाय्याने 2 ते 3 हेक्टर क्षेत्र दिवसाकाठी पेरून होते. लाकडी पेरणी अवजाराचे दिंड बाभळीच्या लाकडाचे चौकोनी किंवा षट्कोनी आकाराचे असते. फण-सुध्दा बाभळीच्या लाकडाचा लहान परंतु जाड व मजबूत तुकडयांपासून बनवितात. फण दिंडात भोके पाडून भक्कमपणे बसवलेले असतात. फणावर भोके पाडून त्यावर बांबूच्या नळया बसवून त्याच्यावर चाडे बसवलेले असते. जितके फण तितक्या नळया परंतु चाडे एकच असते. सुधारित लोखंडी पेरणी अवजारासाठी दिंड व फण लोखंडी बनवतात. नळयासाठी लोखंडी 1 इंच व्यासाच्या पाइपचा वापर करतात. अलीकडच्या काळात लोखंडी चाडयांचा वापरसुध्दा केला जातो. चाडयाची घडण घनाकृती माथा कातून गोल केलेला, खालचा भाग चौकोनी, वरच्या गोल माथ्याला कोरून वाटीसारखा आकार दिलेला, त्याच्या मधोमध खुंटीसारखा उंचवटा (ह्याला ‘माशी’ म्हणतात) आणि या माशीच्या सभोवती पेरावयाच्या बिया जाण्यासाठी फणांच्या संख्येइतकी भोके पाडलेली अशी असते.
पेरणीसाठी अवजार तयार करताना, त्याच्या फणाइतक्या नळया चाडयाला जोडून घेतात. चाडे मजबूत दोरीने अवजाराच्या दांडीला आणि दिंडाला धरून एक विशिष्ट गाठ देवून घट्ट आवळून बांधतात. या गाठीला चाडेगाठ असे नाव आहे. अवजार पेरणीसाठी चालू असताना पेरणारा मनुष्य बी मुठीने चाडयांतील माशीवर सोडतो. ते चाडयाच्या वाटीत सर्वत्र पसरून भोकावाटे त्यांना जोडलेल्या नळयामधून फणाला असलेल्या भोकांमधून मातीत, फणामुळे तयार झालेल्या तासात पडते. एक दिवसाकाठी साधारण एक हेक्टर क्षेत्रावर पेरणी होऊ शकते.
महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्फे कोणत्याही देशी पाभरीवर बसविता येण्यासारखे सुधारित पेरणी यंत्र 1960 साली तयार केले आहे. या सुधारित पेरणी यंत्राच्या साहाय्याने योग्य त्या खोलीपर्यंत आपोआप ठराविक प्रमाणात बी योग्य प्रकारे पेरता येते आणि दिवसाकाठी देशी पाभरीच्या दुप्पट पेरणीचे काम होऊ शकते.
सुधारित परेणीची अवजारे : बैलचलित देशी तिफण किंवा चौफण वापरताना पेरणीची खोली आणि दोन रोपांमधील अंतर नियंत्रित करण्याची कोणतीही सोय नसल्याने होणा-या कामाची प्रत ही पूर्णपणे बैल हाकणा-या व पेरणी करणा-या मजुराच्या कौशल्यावर अवलंबून असते. सुधारित पेरणी यंत्रामध्ये या अडचणींवर मात करण्यात आलेली आहे.
पुणेरी पेरणी यंत्र : हे पेरणी यंत्र म्हणजे सुधारित तिफण आहे. यंत्राच्या साहाय्याने बी पाहिजे त्या प्रमाणात नियंत्रित खोलीवर आणि दोन ओळींमध्ये

आ. 7. पुणेरी पेरणी यंत्र: (1) बियांची पेटी, (2) बी वाहक नळया, (3) जोड चाक, (4) जमिनीवर फिरणारे चाक, (5) दिंड, (6) दाते (फणा), (7) दांडी.

योग्य अंतर ठेवून पेरता येते. बियांसाठी बसवलेल्या पेटीच्या खालच्या बाजूला बी नियंत्रित करण्यासाठी फिरक्या बसवलेल्या असतात त्यातून बी प्लॅस्टिकच्या नळीमधून उतरून योग्य त्या खोलीवर पडते.
यंत्राच्या मागे बसवलेले लाकडी चाक, सायकलचे दातेरी चाक व चेन यांच्या साहाय्याने फिरक्यामधून जाणा-या आसाला गती दिलेली असते. मागचे चाक फिरू लागल्याबरोबर फिरक्यामधून दाणे सुटतात व नळयावाटे जमिनीत जातात. दातेरी चाक अथवा लाकडी चाक बदलून ज्वारी, भात, गहू इ. पिकांची पेरणी करता येते.
सुधारित खत व बी पेरणी यंत्र : सुधारित पुणेरी पेरणी यंत्रामध्ये आणखी सुधारणा करून बिया बरोबरच रासायनिक खत पेरून देण्याची व्यवस्था केलेली आहे. रासायनिक खते ठेवण्यासाठी वेगळी पेटी पेरणी यंत्रावर बसवून त्याच्याखाली खत नळयांत सोडण्यासाठी भोके असलेल्या गोल चकत्या बसवलेल्या असतात. या यंत्राच्या फणाला दोन भोके पाडलेली असतात. वरच्या भोकांतून बी पडते आणि खालच्या भोकांतून खत जमिनीत पडते. बियांचे आणि खतांचे नळे वेगळे असतात. बियांपासून योग्य अंतरावर आणि खोलीवर खत पेरून दिल्याने खतांची बचत तर होतेच; परंतु बियांची उगवण जोमदार होत असल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे सिध्द झाले आहे.
बैलचलित टोकण यंत्र : उत्पादन वाढीचे लक्ष गाठताना पिकाची पेरणी योग्य प्रकारे करणे हे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. पारंपरिक पेरणी अवजाराद्वारे पेरणी करताना दोन ओळींतील अंतर गरजेनुसार ठेवता येते. परंतु दोन रोपांमधील अंतरावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने पेरणी, कधी दाट तर कधी पातळ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम उत्पादनावर होतो. हा परिणाम टाळण्यासाठी बियांची मजुराकरवी टोकण केली जाते. यामध्ये मजुरीचा खर्च खूपच वाढत असल्याने संशोधकांनी पारंपरिक पेरणी यंत्रांतच सुधारणा करून टोकण यंत्र तयार केले. टोकण यंत्राच्या वापराने दोन ओळींतील तसेच दोन रोपांतील अंतर शिफारशीनुसार ठेवणे शक्य होते. टोकण यंत्रामध्ये असलेल्या बियांच्या पेटीखाली फिरणा-या उभ्या अथवा आडव्या गोल चकत्या बसवलेल्या असतात. या चकत्यांना असलेल्या खाचेमध्ये अथवा लहान खड्डयामध्ये एक किंवा दोनच बिया मावतात आणि चकतीच्या दोन खाचांत अथवा खड्डयात ठेवलेले अंतर दोन रोपांमधील अंतर ठरवते. टोकण यंत्राच्या वापरामुळे बी ठराविक अंतरावर पडल्यामुळे उगवून येणा-या रोपांना योग्य प्रमाणात हवा व सूर्यप्रकाश मिळत राहिल्याने पिकाची वाढ चांगली होते व पर्यायाने उत्पादनात वाढ होते. या यंत्राच्या वापरासाठी एका बैलजोडीची गरज असते. दिवसाकाठी साधारणपणे 1 ते 1 हेक्टर क्षेत्रावर टोकण पध्दतीने पेरणी करता येते. बाकीची सर्व रचना नेहमीच्या पाभरीसारखीच असते.