शेख मुहम्मद अब्दुल्ला:( 5 डिसेंबर 1905 -8 सप्टेंबर 1982). जम्मू-काश्मीरचे एक राजकीय नेते. जन्म श्रीनगरच्या सौरा या उपनगरात. सुरुवातीचे शिक्षण श्रीनगरमध्ये घेऊन त्यांनी अलीगढ मुस्लिम विद्यापीठाची एम्.एस्सी. पदवी मिळविली (1930) आणि शिक्षकी पेशा स्वीकारला. काश्मीर संस्थानात सरकारी नोक-यांत मुस्लिम युवकांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठी त्यांनी युवक मुस्लिम संघटनेची स्थापना केली (1930); पण त्यामुळे त्यांना शिक्षकाची नोकरी गमवावी लागली. अब्दुल कादरवरील खटल्याच्या वेळी पोलिसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराच्या (1931) निषेधार्थ नेमलेल्या समितीचे ते सदस्य होते. पुढे मुस्लिम कॉन्फरन्सच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली (1932). या पक्षाचे नॅशनल कॉन्फरन्स असे नामकरण करण्यात आले (1939). त्यांनी सरंजामशाही, साम्राज्यशाही आणि जमातवाद यांविरुध्द भूमिका घेतली. 1940 नंतर नव्या काश्मीरची चळवळ सुरू केली. पूर्वेकडील नव्या जागृतीचे ती प्रतीक होती. जबाबदार शासन, लोकशाही राजवट, स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि मूलभूत अधिकार यांची त्यांनी मागणी केली. समता, स्वातंत्र्य व न्याय यांवर आधारलेल्या समाजवादी समाजरचनेचा त्यांनी पुरस्कार केला. पुढे काश्मीरच्या महाराजांविरुध्द त्यांनी ‘ काश्मीर छोडो’ आंदोलन छेडले (1946). तेव्हा त्यांना नऊ वर्षांची सजा झाली. त्याच सुमारास अखिल भारतीय संस्थानी प्रजा परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळे त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली (29 सप्टेंबर 1947). पाकिस्तानने काश्मीरात घुसखोर पाठवून कब्जा घेण्याचा प्रयत्न केला; तेव्हा अब्दुल्लांनी त्याविरुध्द जनआंदोलन उभे केले व भारतीय संघराज्यात काश्मीरच्या सामिलीकरणासाठी जनमत तयार केले (1947). नंतर काश्मीर राज्याच्या आणीबाणी प्रशासनाचे ते प्रमुख बनले (31 ऑक्टोबर 1947). पुढे त्यांना सदर-इ-रियासत करण्यात आले (5 मार्च 1948). ते भारतीय घटना समितीचे सदस्यही होते.
0 comments:
Post a Comment